मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘देवाभाऊ’ असं पोस्टर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात येत होता. विशेष म्हणजे या पोस्टरमुळे महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील नाराज असल्याची चर्चा होती. अखेर यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाचे पोस्टर झळकवण्यात आले. पण त्यांच्या या पोस्टरवरुन विरोधकांपेक्षा सत्ताधारी मित्रपक्षांचेच नेते नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली. या पोस्टरच्या माध्यमातून भाजप मराठा आरक्षणाचं श्रेय एकटं घेत असल्याची भावना मित्रपक्षाच्या नेत्यांची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु होती. याबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस यांना ‘एबीपी न्यूज’च्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“आमच्या सहकाऱ्यांना काही अडचण झाली असं मानणं चुकीचं आहे. तसंच काहीच नाही. पोस्टरमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करत आहे आणि त्या फोटोवर देवाभाऊ असं लिहिलं आहे. बाकी त्या पोस्टरमध्ये काहीच नाही. त्या पोस्टरवर भाजप पक्षाचं नाव नाही किंवा कोणत्याही कामाचं श्रेय घेतल्याचं लिहिलेलं नाही. एवढं साधं पोस्टर आहे. पण या साध्या पोस्टरने आमच्या विरोधकांना मिरची लागली”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“हे पोस्टर माझ्या पक्षाने लावलं. याचा अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नव्हते. तर महाराजांनी त्यावेळच्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करत आपलं सैन्य तयार केलं होतं. आम्ही यापैकी कुणा एका बाजू घेऊ, मराठा समाजाचा मोठा इतिहास आणि योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे या समाजाकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाहीत. त्यासोबतच मागास वर्ग, ओबीसी समाजाला आम्ही दूर केलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारापांसून दूर जाऊ. त्यामुळे आम्ही आरक्षणाबाबत जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे मराठा समाजाला फायदा झाला. त्यासोबतच ओबीसी समाजात जी भीती होती ते झालं नाही. त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की, महाराज आम्ही आपल्या विचारांसोबत चाललो. पण ज्यांच्या मनात जातीवाद आहे. त्यामुळे त्यांना मिरची जास्त लागली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन राजकारणात भूकंप घडवणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले… “माझ्या पक्षाने असा कुठला पोस्टर लावला तर माझ्या सहकाऱ्यांना काय अडचण होणार आहे? माझ्या सहकारी पक्षाच्या नेत्यांचं एक वाक्य त्या पोस्टरच्या विरोधात दाखवून द्या. माझ्या सहकाऱ्यांना मी चांगल्या पद्धतीने ओळखतो. मी त्यामध्ये कोणतंही क्रेडीट घेतलेलं नाही. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा