Maratha Reservation: पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलची बैठक पार पडली असून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा व ओबीसी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण धोक्यात असल्याचा मुद्दा मांडत पुढील काळात ओबीसी समाजाकडून दोन मोर्चे काढण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दबावापोटी मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णय काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे पुण्यात काँग्रेस भवन येथे ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद, आमदार वडेट्टीवार व सतेज पाटील, सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी माजी आमदार व माजी नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार व अनिल जयहिंद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
50-50 अन् 60-40; विशेष प्रस्तावासह मनसे आग्रही; उद्धवसेनेला धास्ती, युतीची चर्चा कुठपर्यंत पोहोचली?
‘राज्य सरकार समाजाला मूर्ख बनवत असून सर्वांचे वाटोळे करत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हिसकावून घेतले गेले असून, या गरीब समाजाला आरक्षणाचे संरक्षण राहील का, असा सूर उमटत आहे. ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी 10 ऑक्टोबरला नागपूर आणि 20 ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही आम्ही चर्चा करत असून त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
तत्पूर्वी, ओबीसी समाजाला योग्य आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्राने लागू करावा, अशी मागणी अनिल जयहिंद यांनी केली.
भाजप दुतोंडी गांडूळ
‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भारतीय जनता पक्ष दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड व शेपूट आहे. हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या व जल्लोष करणाऱ्यांचा देशात अगरबत्ती व धूप लावून यथोचित सत्कार केला पाहिजे,’ असा निशाणाही वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर साधला.

