Manoj Jarange Mumbai Protest Updates : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत मागणी मान्य न झाल्यास शनिवार-रविवारपर्यंत मुंबईत मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसंच आम्ही आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
चहूबाजूने कोंडी, पण जरांगेंचा एल्गार; सरकारला थेट इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण नोंदवत काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दिलेले नियम डावलण्यात आल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार घेत सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “आमची मागणी मान्य केली नाही तर शनिवारी आणि रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येतील आणि मग सोमवारचं आंदोलन छान होईल,” असा सूचक इशारा जरांगे यांनी दिला आहे.
सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कोर्टाने आदेश दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच्या गाड्या लगेच हटवल्या आहेत. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. परंतु मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थानचे गॅझेटियर लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत हा शासन निर्णय जारी करा. फडणवीसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. ते कोर्टाकडे चुकीची माहिती देतात. पण आम्ही आझाद मैदानातून हटणार नाही,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे)
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा