• Fri. Mar 13th, 2026
    Maratha Reservation : डीजेवर नाचणं टाळा, हुल्लडबाजीही नको, मनोज दादांची इज्जत घालवू नका, मराठा समन्वयकांचं आंदोलकांना आवाहन

    Manoj Jarange Patil Maratha Andolan : रस्त्यात हुल्लडबाजी करु नका, दारु पिऊन यायला लागलात, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू, असं मराठा आरक्षण समर्थक गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले.

    मराठा आंदोलक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा बांधवांनी दक्षिण मुंबईत मोठी गर्दी केली आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना काही आंदोलकांकडून हुल्लडबाजी होत असल्याचेही आरोप केले जात आहेत. त्यानंतर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे पाटील यांनी मराठा बांधवांचे कान टोचले आहेत. पोलिसांना सहकार्य करा, शिस्त आणि संयमाचं पालन करा, दारु पिऊन आलात, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू, असंही पाटील म्हणाले.

    मराठा बांधवांना काय आवाहन?

    “मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की, आपल्या समाजाचं दैवत, मनोज दादा आपल्या समाजासाठी, तुमच्या-आमच्यासाठी रात्रंदिवस लढत आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आदल्या दिवशीही त्यांनी काही खाललं नव्हतं, त्यांची तब्येत खराब आहे, अशात आपण जर चुकीचं वागायला लागलो, रस्त्यात हुल्लडबाजी करायला लागलो, दारु पिऊन यायला लागलो, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू” असं गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले.”सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे, रस्ते अडवले नाही पाहिजेत, रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आपण जी शिस्त आणि शांतता दाखवून दिली, ती अपेक्षित आहे. मनोज दादा रोज सकाळ संध्याकाळ सगळ्या महाराष्ट्राला आणि मराठा बांधवांना आवाहन करत आहेत, आणि इथे येणारे आपणच जर गाणं वाजवत असू, डीजेवर नाचत असू, तर मनोज दादांच्या मनाला काय वेदना होत असतील, याचा विचार करा” असंही ते पुढे म्हणाले.
    Maharashtra TimesJalgaon Crime : घरगुती वाद विकोपाला, 30 वर्षीय लेकाने जन्मदात्याला निर्घृणपणे संपवलं, नेमकं काय घडलं?
    “मनोज दादा एवढं जीव जाळून उपोषण करत आहेत. त्यांचं हे आठवं उपोषण आहे, या उपोषणामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तरी ते तुमच्या आमच्यासाठी ठामपणे लढत आहेत. आणि जर काही लोकांनी मुंबईच्या रस्त्यावर अपवादात्मक परिस्थितीत गैरकृत्य केलं, तर ते चुकीचं आहे.” असं काळकुटे पाटलांनी बजावलं.

    जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंची गाडी मराठा बांधवांनी अडवली, पवारांच्या नावाने घोषणाबाजी!

    “पोलीस बांधवांना कुठलाही त्रास होता कामा नये, पत्रकार बांधवांच्या बाबत एक घटना घडली, त्याबद्दल आम्ही जाहीर माफी मागितली आहे, तसं वर्तन कुणी पुन्हा करु नये, मुंबईकरांना त्रास होता कामा नये, रस्ते अडवू नका, रेल्वेला अडथळा निर्माण करु नका, मुंबईकर जिथे मिळेल तिथे जागा देत आहेत, सहकार्य करत आहेत, पण तुम्ही-आम्ही त्या गोष्टीची जाणीव ठेवायला हवी, मराठा समाज आणि मनोज दादाची इज्जत गेली नाही पाहिजे” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
    Maharashtra TimesNavya Malik : ड्रग्ज तस्करीचं मोठं रॅकेट सापडलं, मुंबईतून इंटिरिअर डिझायनर तरुणीला अटक, 36 जणांसोबत…

    “छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठा समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. त्याला गालबोट लागता कामा नये, आपण शांततेत क्रांती करणारे आहोत, याचा विसर पडू देऊ नका, कुठलंही व्यसन करु नका, भूलथापांना बळी पडू नका, कायदा हातात घेऊ नका, कुणी काही चुकीचं करत असेल, तर त्याला तिथेच त्या जागी रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या” असं आवाहनही पाटलांनी केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा