• Tue. Mar 10th, 2026

    Manoj Jarange Patil: जरांगेंच्या आंदोलनाचा प्रचंड दबाव, सरकारच्या मॅरेथॉन बैठका; आरक्षणाचं काय ठरलं? बैठक संपताच विखे पाटील म्हणाले…

    Manoj Jarange Patil: जरांगेंच्या आंदोलनाचा प्रचंड दबाव, सरकारच्या मॅरेथॉन बैठका; आरक्षणाचं काय ठरलं? बैठक संपताच विखे पाटील म्हणाले…

    Maratha Reservation: मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आरक्षणासंदर्भात कायदेशीर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

    सरकारच्या मॅरेथॉन बैठका; आरक्षणाचं काय ठरलं? बैठक संपताच विखे पाटील म्हणाले…(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राजधानी मुंबईत लाखो मराठा आंदोलक सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याने सरकारचीही कोंडी झाली असून आरक्षणासाठीचा दबाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा सपाटा सुरू असून आज पुन्हा एकदा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि मराठ्यांच्या ओबीसीकरणाबाबत सरकारचा काय विचार आहे, याबाबत विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.

    बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “कुणबी दाखल्यांसदर्भात स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेब आणि आमच्या सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काय कार्यवाही सुरू आहे, याची माहिती सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना दिली. त्यानंतर जरांगे यांच्याकडून शिष्टमंडळाकडे जे मुद्दे मांडण्यात आले त्याबाबत चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरचे तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यात काही कायदेशीर अडचणी आहेत, त्यामुळे अंमलबजावणीसाठी काही बाबी आम्ही तपासून पाहू आणि पुन्हा जरांगेंसोबत चर्चा करू,” अशी माहिती विखे यांनी दिली.

    Maharashtra Timesपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, अजित पवारांची स्पष्टोक्ती, म्हणाले…

    दरम्यान, “आज संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत आमची चर्चा होईल. विधी आणि न्याय खात्याचे सचिव आणि आमच्या खात्याचे सचिव अशा सगळ्यांची कायदेशीर गुंता सोडवण्यासाठी बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही अंतिम प्रस्ताव मनोज जरांगे यांना पाठवू,” असंही विखे पाटील यांनी सांगितलं आहे.

    शरद पवारांवर निशाणा

    घटनेत बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवणे, हाच मराठा आरक्षणासाठी पर्याय आहे, अशी भूमिका काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. या भूमिकेवरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “मला शरद पवारांचं आश्चर्य वाटतं. ते चार वेळ राज्याचे मुख्यमंत्री होते. तसंच केंद्रातही मंत्री होते. त्यांच्या काळात ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, असं त्यांना का वाटलं नाही? या मुद्द्यावरून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करू नये,” असा हल्लाबोल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा