Ganesh Naik : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत ‘शिंदेंना लॉटरी लागली’ असे म्हटले आहे. पालघरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी, एकनाथ शिंदेंना नशिबाने मोठी संधी मिळाली आहे, असे म्हटले.
गणेश नाईक म्हणाले, लॉटरी लागली ही आनंददायी गोष्ट आहे. मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असे वक्तव्य गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केले आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो होतो. त्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे वडील विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा हे देखील जिल्हा नियोजनाच्या बैठकीत असायचे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे आमदार एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत असायचे. मात्र एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली याचा मला आनंद आहे. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते, असे सूचक विधान गणेश नाईकांनी केले.

