• Fri. Mar 13th, 2026
    ‘शिंदेंना लॉटरी लागली, पण ती टिकवता आली पाहिजे…’ गणेश नाईकांचे सूचक विधान; भाजपकडून भाईंना दुय्यम वागणूक?

    Ganesh Naik : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत ‘शिंदेंना लॉटरी लागली’ असे म्हटले आहे. पालघरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी, एकनाथ शिंदेंना नशिबाने मोठी संधी मिळाली आहे, असे म्हटले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नमित पाटील, पालघर : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. यातच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काही निर्णयांवरुन तसेच वादग्रस्त मंत्र्यांमुळे विसंगती दिसून येत आहे. यातच आज राज्याचे वनमंत्री तथा भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठे भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदेंना तर लॉटरी लागली, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    गणेश नाईक म्हणाले, लॉटरी लागली ही आनंददायी गोष्ट आहे. मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असे वक्तव्य गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केले आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

    पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो होतो. त्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे वडील विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा हे देखील जिल्हा नियोजनाच्या बैठकीत असायचे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे आमदार एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत असायचे. मात्र एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली याचा मला आनंद आहे. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते, असे सूचक विधान गणेश नाईकांनी केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा