महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Ratnagiri Dapoli Youth Dies : रत्नागिरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्यावरील खांब्यांवर लाईट बदलण्यासाठी खांबावर चढत असताना युवकाला हृदविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल सुभाष भोळे हे गाव परिसरात विजेच्या खांबांवरत पथदिवे बदलण्याचे काम करायचे. लाडघर येथे लाईट बदलण्यासाठी ते शिडी घेऊन विजेच्या खांबावर चढले होते. यावेळी ते विजेच्या खांबाला लावलेल्या शिडीच्या दोन तीन पायऱ्या चढले आणि अचानक खाली कोसळले. बाहेर मोठा आवाज झाला म्हणून विजेच्या खांबाजवळ असलेल्या घरातील माणसांना आवाज आल्याने पाहण्यासाठी माणसं बाहेर आली. मात्र, स्नेहल भोळे हे विजेच्या खांबावरून खाली पडले होते. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. स्नेहल भोळे हे मूळचे रत्नागिरी जाकादेवी येथील होते. लाडघर येथे त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांनी येथे घर बांधलं आहे.
राजकारणात काहीतरी मोठं घडतंय, एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार
सुरुवातीला महावितरणाच्या विजेच्या खांबावर शॉक लागून मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. विजेच्या खांबावर चढले असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. स्नेहल भोळे यांचं कुटुंब मुंबई येथे आहे. लाडघर येथे ते आपल्या घरी एकटेच वास्तव्यास होते. मदतशील व्यक्तिमत्व म्हणून ते परिसरात ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने लाडघर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
