Nagpur News : नागपूरमध्ये जवानाने दारुच्या नशेत कार चालवल्याने एकच गोंधळ उडाला होता. २५ ते ३० जणांना जीव मुठीत होता. संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केला आहे.
सदर जवानाचे नाव हर्षपाल महादेव वाघमारे (वय अंदाजे ४०) असून तो हमलापुरी (ता. रामटेक) येथील रहिवासी आहे. हर्षपाल भारतीय लष्करात आसाम येथे कार्यरत असून सुट्टीवर आपल्या गावी आला होता. रविवारी सायंकाळी त्याने दारूच्या नशेत MH 40 CA 6377 क्रमांकाची कार नगरधन गावातून चालवली. नशेच्या अंमलाखाली असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे जाताना रस्त्यावरील नागरिकांना एकामागोमाग एक कट मारायला सुरुवात केली.
आई…येतो गं! हसत-खेळत घरातून निघाला, कामावर जाताना तरुणासोबत अघटित घडलं, कुटुंबाचा काळीज चिरणारा आक्रोश
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे याने इतक्या बेफिकिरीने गाडी चालवली की परिसरात अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक महिला, मुले आणि वृद्ध थोडक्यात बचावले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या प्रकारानंतर गोंधळ उडालेल्या गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून हमलापुरी रोडवरील हनुमान मंदिराजवळ त्याला गाठले. दरम्यान, त्याची कार झाडाला धडकली आणि नाल्यात कोसळली. गावकऱ्यांनी त्याला गाडीतून ओढून बाहेर काढले आणि संताप व्यक्त करत चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या तावडीतून वाघमारे याची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. नंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात निष्काळजी व बेदरकारपणे वाहन चालवण्याचा गुन्हा नोंदवला आहे. लष्कराशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. गावकऱ्यांनी मागणी केली आहे की, लष्करी शिस्त पाळणाऱ्यांकडून असे गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाऊ नये. याबाबत कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून इतरांना धडा मिळेल.

