• Fri. Mar 6th, 2026
    Rain Alert: मुंबई, ठाणे, पालघरला आज मुसळधार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, कुठे कोणता ॲलर्ट?

    Maharashtra Weather Update: बुधवारी दिवसभरात मुंबई शहरात २८.५७, पूर्व उपनगरात ३९.५० व पश्चिम उपनगरात ३५.०९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. ठाणे व नवी मुंबईतही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.

    maharashtra rain alert (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकणात दोन दिवसांपासून सरी बरसत आहेत. पावसाचा जोर गुरुवारीदेखील कायम असेल. या दरम्यान कोकणात व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अॅलर्ट घोषित केला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचा मोठा प्रभाव प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यांवर दिसून येत आहे. यामुळेच कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी गुरुवारी रेड अलर्ट असेल. त्याचवेळी मुंबईसह ठाण्यातही ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली.
    Devendra Fadnavis: शहरी माओवादी पुन्हा सक्रिय; कोलकाता, बेंगळुरुत अड्डे असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
    मुंबईत मंगळवारी सुरू झालेला पाऊस बुधवारी सायंकाळपर्यंत होता. मंगळवारी स.८.३० ते बुधवारी स. ८.३० या २४ तासांत कुलाबा येथे ८६.६ तर सांताक्रुझ येथे ८४.६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. हाच आकडा बुधवारी सायंकाळी साडे पाचपर्यंत (सकाळी साडेआठपासून) कुलाबा येथे २५ व सांताक्रुझ येथे ४२ मिलीमिटर इतका नोंदला गेला. बुधवारी दिवसभरात मुंबई शहरात २८.५७, पूर्व उपनगरात ३९.५० व पश्चिम उपनगरात ३५.०९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. ठाणे व नवी मुंबईतही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.
    खेळता-खेळता चिमुकल्याशी वाद, मध्यरात्री गेले अन्…, जालना आश्रमशाळेतील 2 अल्पवयीन मुलांचं भयंकर कृत्य
    आता गुरुवारी उत्तर व दक्षिण कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. अधून-मधून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

    विदर्भात पुराची शक्यता
    पूर्व विदर्भात २५-२६ जुलैदरम्यान धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळणे, पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
    सुनील तटकरेंच्या सांगण्यावरुनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
    सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती
    मुंबईतील समुद्राला २४ जुलै ते २७ जुलै या कालावधीत सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. २६ जुलैला सर्वांत मोठी, म्हणजेच ४.६७ मीटर उंचीची भरती येणार आहे. भरतीकाळात समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. गुरुवारी सकाळी ११.५७ वाजता ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. शुक्रवारी दुपारी १२.४० वाजता ४.६६ मीटर, २६ जुलैला दुपारी १.२० वाजता ४.६७ मीटर आणि रविवारी दुपारी १.५६ वाजता ४.६० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस पडला आणि त्याचवेळी समुद्राला मोठी भरती असेल तर ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. या चार दिवसांत भरतीवेळी समुद्राच्या लाटा ४.५० मीटर उंचीपेक्षाही जास्त उसळणार आहेत. अशा वेळी पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याचे पंपिग स्टेशनचे दरवाजे, सांडपाणी सोडण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लडगेट बंद ठेवण्यात येतात. परिणामी सखल भागात पाणी साचते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा