• Sat. Jul 4th, 2026

    मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 18, 2025
    मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून प्राप्त जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळणे म्हणजे मराठा इतिहासाचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आहे. ही संपूर्ण भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवउद्गार केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत काढले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याला मिळालेल्या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोने प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानांकनांच्या निमित्ताने आयोजित कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक डॉ. तेजस गर्गे, फिल्म सिटीच्या स्वाती म्हसे उपस्थित होते.

    केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले, भारताच्या सांस्कृतिक संपदेचे जतन, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे सन्मानास्पद स्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे. महाराष्ट्राच्या या अमूल्य वारशाचे युनेस्कोने केलेले मानांकन म्हणजे संपूर्ण राष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा विजय आहे.

    सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्याच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले. हे गड-किल्ले फक्त लढाया आणि पराक्रमाची साक्ष नाहीत, तर जनकल्याणाची प्रेरणास्थळेही आहेत. मानांकनासाठीच्या कार्यात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

    यापुढेसुद्धा या गड-किल्ले आणि अन्य गड-किल्ल्यांचं पावित्र्य, स्वच्छता, सुशोभीकरण ही कामे शासन करेलच. पण या १२ गडकिल्ल्यांच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक शिवभक्ताचेही कर्तव्य असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

    सांस्कृतिक पुनर्जागरणाचा संदेश देणारा ऐतिहासिक टप्पा असून यापुढे संरक्षण, व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

     

    अपर मुख्य सचिव  खारगे यांनी यावेळी सांगितले की, सर्वांची जबाबदारी ही तेवढीच वाढली आहे. गड-किल्ल्यांच्या सुरक्षितेबरोबरच पर्यटकांना आणि शिवभक्तांना या १२ गड किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी  केले. मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शाहीर प्रवीण फणसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला.

    ००००००००

     

    राजू धोत्रे/वि.सं.अ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed