• Wed. Mar 18th, 2026
    राज मौन, तर उद्धव ऍक्शन मोडवर; युती झाली नाही तरी ‘आता थांबायचं नाय’; ठाकरेंचे 2 प्लान काय?

    ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, कारण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना युतीसाठी स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, राज ठाकरेंनी युतीबाबत मौन बाळगल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र आले. त्यांच्या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता शिवसेना उबाठा आणि मनसेची युती झाल्यास त्याचा मोठा फायदा ठाकरे ब्रँडला होऊ शकतो. ठाकरे ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं विधान खुद्द राज यांनी केलेलं आहे. यानंतर वरळीत झालेल्या मेळाव्यात उद्धव यांनी एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत युतीचे स्पष्ट संकेत दिले. म महापालिकेचा नव्हे, तर म महाराष्ट्राचा म्हणत त्यांनी मनसेसोबत दिर्घकालीन युतीचे संकेत दिले. पण अद्याप तरी राज यांच्या पक्षाकडून कोणताही प्रतिसाद शिवसेना उबाठाला मिळालेला नाही.

    मीरारोडमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी दुकानदाराला मारहाण केली. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. त्यानंतर अमराठी व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढला. त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाआधी मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी शिवसेना उबाठाचे नेते मोर्चाला पोहोचले. यानंतर काही वेळानं मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून सुटका झाली. मोर्चाची सांगता मनसे आणि शिवसेना उबाठा नेत्यांच्या भाषणांनी झाली.

    एकीकडे मनसे आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी महत्त्वाचा आदेश काढला आहे. ‘पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही,’ असं फर्मान राज यांनी काढल्यानं संभाव्य युतीबद्दल संभ्रम वाढलेला आहे.

    संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरे यांना साद घातली. युतीबद्दल स्पष्ट संकेत दिले. पण राज यांच्याकडून अद्याप तरी उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मनसैनिक, अनेक नेते युतीसाठी आग्रही असताना राज यांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्यानं संभ्रम निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या पक्षात महत्त्वाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

    राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी न दिल्यास काय करायचं, यावर उद्धवसेनेनं काम करण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर लढल्यास आणि काँग्रेसला सोबत घेतल्यास मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये काय चित्र दिसेल, याची चाचपणी सुरु आहे. गेल्या तीन वर्षांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुंबईसह आसपासच्या महापालिका क्षेत्रांमध्ये हादरे दिले आहेत. अनेक माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यानं उद्धव यांचा पक्ष कमकुवत झालेला आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास उद्धवसेनेची अवस्था बिकट होऊ शकते.

    काँग्रेसच्या साथीनं मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीत उतरल्यास काय होईल, याची चाचपणीदेखील सुरु आहे. ठाकरेंना अद्याप मुंबईत जनाधार आहे. विधानसभेला उद्धवसेनेनं २० जागा जिंकल्या. त्यातील १० जागा मुंबईतील आहेत. मुंबईत असलेला मुस्लिम मतदार गेल्या दोन निवडणुकांमध्ये उद्धव यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काँग्रेस सोबत असल्यास हा मतदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी राहू शकतो. त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतल्यास काय होऊ शकतं, याची चाचपणी केली जात आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा