• Wed. Mar 11th, 2026
    पावसाने वाढली चिंता! एल्फिन्स्टन पुलालगतच्या १९ इमारतींचा समुहविकास रखडला, शासनादेशाची प्रतीक्षा

    Mumbai News housing policy : वरळी-शिवडी कनेक्टरमुळे प्रभावित होणाऱ्या, प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलालगतच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या चाळींमधील रहिवासी आता पावसाळा सुरू झाल्याने संकटात आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा.प्रतिनिधी, मुंबई : वरळी-शिवडी कनेक्टरमुळे प्रभावित होणाऱ्या, प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन पुलालगतच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या चाळींमधील रहिवासी आता पावसाळा सुरू झाल्याने संकटात आले आहेत. तेथील १९ चाळींच्या समूह पुनर्विकासाचा (क्लस्टर रीडेव्हलपमेंट) निर्णय होऊन तीन महिने लोटले आहेत. मात्र अद्याप शासनादेश निघालेला नाही. त्यामुळे या चाळीतील रहिवासी संकटात आहेत.

    या प्रकल्पासाठी सुरुवातीला प्रभादेवी व परळ भागातील १९ चाळी व इमारती पाडल्या जाणार होत्या. मात्र त्यांच्या पुनर्वसनाचा खर्च पाच हजार दोनशे कोटी रुपयांच्या घरात गेल्याने, एमएमआरडीएने या कनेक्टरचे संरेखन बदलले. त्यात लक्ष्मी निवास व हाजी नुराणी या दोन चाळी आणि रेल्वेमार्गावरील एलफिन्स्टन पूल पाडून, नवा दुमजली पूल उभारण्याचे ठरविण्यात आले. या दोन चाळींतील ८३ कुटुंबे व दुकानदारांचे तात्पुरते संक्रमण शिबिरात स्थलांतर करून त्यांना घरांच्या बदल्यात अन्यत्र घर किंवा रेडीरेकनरएवढी किंमत हे पर्याय देण्यात आले होते. मात्र अनेक वर्षे प्रभादेवीत वास्तव्य असलेले हे रहिवासी अन्यत्र जाण्यास तयार नाहीत. तसेच त्या भागातील बाजारभाव हा रेडीरेकनरच्या दुप्पट असल्याने मोबदला तुटपुंजा ठरणार आहे. त्यासही स्थानिक तयार नाहीत. त्याचवेळी, या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान अन्य १७ चाळींनाही धक्का बसणार आहे. त्यामुळे त्या सर्वच चाळींचे त्याच जागी पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.
    GMLR Tunnel: गोरेगाव ते मुलुंड प्रवास फक्त २५ मिनिटांत; जुळ्या बोगद्यांसाठी राष्ट्रीय उद्यानातील १९ हेक्टर जागेला मान्यता
    या पार्श्वभूमीवर, पुलासाठी पाडल्या जाणाऱ्या दोन व अन्य १७ अशा सर्व १९ चाळींचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्याचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातील बैठकीत एप्रिल महिन्यात झाला होता. मात्र हा पुनर्विकास कोणत्या प्राधिकरणाकडून करायचा, याबाबत नगरविकास खाते निर्णय घेऊ शकलेले नाही. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने, मोडकळीस आलेल्या या १९ चाळींमधील रहिवासी धास्तावले आहेत. पुनर्विकास होणार असल्याच्या आशेवर या चाळीतील रहिवासी प्रतीक्षेत आहेत.

    प्रकल्पही पुढे सरकेना

    चाळींच्या क्लस्टर पुनर्विकासासाठी प्राधिकरणाची नियुक्ती होत नसल्याने, एलफिन्स्टन पूल पाडता येत नाही आणि परिणामी अवघा साडेचार किमी लांबीचा, एक हजार २८६ कोटी रुपयांचा प्रकल्पही रखडला आहे. हा प्रकल्प वरळी व शिवडी या दोन्ही बाजूंनी अर्धवट आहे. हा जोडरस्ता पुढे शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूला थेट जोडला जाणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा