• Thu. Mar 12th, 2026

    ठाकरे बंधू एकत्र दिसणारच? 5 जुलैला विजयी जल्लोष होणार, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

    ठाकरे बंधू एकत्र दिसणारच? 5 जुलैला विजयी जल्लोष होणार, उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

    Maharashtra Politics : राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या शिक्षणाबाबतच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांचा हिंदी सक्तीविरोधातील नियोजित मोर्चा रद्द झाल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं. पण उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी विजयी जल्लोषाचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयाबाबत घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार होते. पण आता याबाबत शासन निर्णय रद्द करण्यात आल्याने हा एकत्रित मोर्चा होणार नाही, असं ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. पण यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली.

    येत्या 5 जुलैला विजयी जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा घेण्यात येईल. याबाबत दोन दिवसांत सर्वांशी चर्चा करुन माहिती देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच या कार्यक्रमात सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच 5 जुलैला मराठी माणसं एकत्र येणार असल्याने सरकारने हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    “आज संपूर्ण राज्यभरात हिंदीसक्ती भाषेच्या विरोधात आंदोलन केलं गेलं. सर्व मराठी भाषिकांनी ते आंदोलन केलं. सरकारने काढलेल्या जीआरची होळी केली. मी सुद्धा स्वत: या आंदोलनात सहभागी झालो. शिवसैनिक सु्द्धा होते. मला अभिमान आहे की, मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची शक्ती हरलेलं आहे. मराठी माणूस एकत्र झाला तर सरकारची शक्ती हरवू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळीला देखील झाली होती. पण तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीची तुलना करता येणार नाही. पण सर्वजण पक्षभेद विसरुन एकत्र झाले. त्यावेळेलाही डाव उधळला होता. आजही डाव उधळून लावला आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.”मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की, आपल्या राज्यातील जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न केला की, मराठी भाषेची एकजूट फोडायची, मराठी अमराठी असा भेद निर्माण करायचा आणि अमराठी मते आपल्या पदरात पाडून घ्यायची, असा हा भाजपचा छुपा अजेंडा यामध्ये होता. पण समाधानाची गोष्ट अशी की, मराठी माणसाने सामंजस्याची भूमिका घेतली. आमचा भाषेला विरुद्ध नाही तर सक्तीला विरोध आहे. त्यामुळे फूट पडली नाही”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा