Raj Thackeray And Uddhav Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सातत्याने समोर येत आहेत. दोन्ही बंधू मधल्या काळात विदेश फिरायला गेले होते, अशी माहिती आहे. यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. यामुळे या चर्चा मागे पडल्या होत्या. पण आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असल्या कारणास्तव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण ते खरंच एकत्र येणार का? याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा मी तुमच्या माध्यमांमध्येच बघतोय की, दोन भाऊ एकत्र येणार, दोन पक्ष एकत्र येणार. ही चर्चा चालू कुणी केली?”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. “मीदेखील राज ठाकरेंची ती मुलाखत बघितली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आमच्या कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मोठे आहेत. याचा अर्थ आम्हाला शिवसेना-मनसे पक्ष एकत्र येत आहेत, अशा संबंधात कोणतीही वाक्य त्यांनी म्हटलेली नाहीत. मी तरी तसं काही बघितलं नाही. पण राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा कुणी काय अर्थ काढावा हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे”, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केली.
“महाराष्ट्राचा एखादी समस्या असेल, महाराष्ट्राचा एखादा प्रश्न असेल तर त्यासाठी एकत्र येण्याबाबतचा विषय होता. एवढा लार्जर विचार त्यांच्या मुलाखतीत होता. याचा अर्थ युती होते, एकत्र निवडणुका लढवूया असा अर्थ तर मीडिया काढत असतील. कुणी काय अर्थ काढावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्ही जो अर्थ काढताय तोच मी काढावा, असं होऊ शकत नाही”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
‘युती करावी असा संदेश जात नाही’
“उद्धव ठाकरे काय म्हणाले, काय नाही हा उद्धव ठाकरे यांचा अधिकार झाला. त्यांनी कशावर कोय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, असंही संदीप देशपांडे म्हणाले. युती करायची की नाही करायची हा अधिकार राज ठाकरे यांचा आहे. राज ठाकरे यांच्या मुलाखतीतून युती करावी असा संदेश जात नाही”, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
Raj and Uddhav Thackeray : अरेच्चा! ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीत? संदीप देशपांडे बघा नेमकं काय म्हणाले
“तुमच्या मते हो असेल तर तो लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. युती करायची किंवा नाही याचा सर्वस्व निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांना आहे. संजय राऊतांनी सकारात्मक राहावं, कधी नकारात्मक राहावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मी काय बोलू? युती कुणाशी करायची किंवा नाही करायची याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंर्भात ते योग्यवेळी सांगतील. योग्यवेळी आपल्याला कळे”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

