• Mon. Mar 16th, 2026

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल     

    ByMH LIVE NEWS

    May 12, 2025
    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल     




    वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार केले. दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा एकत्रित झालेला स्वातंत्र्य इतिहासातला एकमेक नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, अशा थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर्धा येथे उभारलेल्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅचलर रोड वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेट दिली व त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुमीत वानखेडे, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्याम देशपांडे, हरीभाऊ वझूरकर आदी उपस्थित होते.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची विज्ञान निष्ठता आपल्याला नवीन पिढीमध्ये रुजवता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांनी मिळूण करणे गरजेचे आहे. सावरकरांनी भारताच्या जाती भेदाविरुध्द उभारलेला लढा, त्यांनी जाती उच्छेदक लिहलेली निबंध आणि त्यातून पतित पावन मंदीर तयार करुन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील जातीव्यवस्था संपली पाहिजे, त्याकरिता त्यांनी केलेले काम त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे. त्यांचे करागृहातील जीवन माझी जन्मठेप यामध्ये आपल्या वाचायला मिळते. त्यांच्यामध्ये किती कणखरपणा होता हे पहायला मिळते, मराठीला अभिजात दर्जा मिळाला त्या मराठीला सगळे महत्वाचे शब्द, भाषा शुध्दी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

    कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित शिल्प प्रदर्शनीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. या स्मरणिकेमध्ये राज्यातील प्रसिद्ध लेखकांचे लेख, सामाजिक संस्थेद्वारे राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आदींचा समावेश आहे.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed