• Thu. Jun 18th, 2026
    राजीनाम्यासाठी दबाव, दिल्ली गाठताच धनुभाऊ स्पष्टच बोलले; दोषी वाटत असेल तर…

    Dhananjay Munde Reacted on Resignation Demand : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होताच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. यातच सोमवारपासून पडद्यामागील घडामोडींना वेग आला होता. यानंतर ते आज दिल्लीत दाखल होताच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी दिल्ली : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई होताच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. यातच सोमवारपासून पडद्यामागील घडामोडींना वेग आला होता. मुंडे काल यावर भाष्य करताना भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. यानंतर ते आज आपल्या खात्याच्या काही कामासाठी दिल्लीत पोहोचले. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याच्या मुद्द्यावक भाष्य केले.

    आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यातच मंत्री धनंजय मुंडेंनीही दिल्लीत हजेरी लावली. ते देखील दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. खासदार संजय राऊतांनी ‘मंत्रिपद वाचवण्यासाठी दिल्लीत जावे लागत असल्याचे म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता.

    राजीनाम्याच्या या मुद्द्यावर भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले, ५१ दिवसात मी एकच गोष्ट बोलतोय की, सरपंच देशमुख यांची हत्या झाली. यात जे दोषी असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे, त्यांना मोठ्यातील मोठी शिक्षा द्या हीच आपली भूमिका आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबतही मुंडेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोण किती दिवस फरार आहे, तुम्ही माझ्यावर ट्रायल करत असाल तर मी त्या गोष्टीवर बोलू नये.

    तर धनंजय मुंडे पुढे म्हणाले, या सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कुठे दोषी वाटत असेल तर राजीनामा मागावा. मी राजीनामा देईल. आता फक्त विषय काढला जात आहे. मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगतील. तर ‘५१ दिवस ज्या पद्धतीने प्रकरणात ट्रायल सुरू आहे. टार्गेट मीच आहे. असेही खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

    धनंजय मुंडेंनी असेही नमूद केले की, मुख्यमंत्री दिल्लीत येणार हे मला दिल्लीला येताना माहीत नव्हतं. मी दिल्लीला निघताना मला कळालं की, देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येत आहेत. मी पहिल्यांदाच अन्न नागरी पूरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली. लोकसंख्या सध्या वाढली आहे. यासोबतच आणखी ८ ते ९ महत्वाचे विषय आहेत, ज्यावर चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक होते. त्यासाठीच मी दिल्लीत आलो. याआधीसुद्धा विभाग पाठपुरावा करत होता. महाराष्ट्राच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत. केंद्रीय मंत्र्यांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहितीही धनंजय मुंडेंनी दिली आहे.

    माझ्या लोकांबद्दल माझी नैतिकता प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय, त्याबाबत मी जे बोललो ते प्रामाणिक बोललो. मी नैतिकतेत दोषी आहे, असं मला वाटत नाही. माझा दोष माझ्या वरिष्ठांना सांगावा लागेल, असेही ते म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed