‘आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही आणि जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांनाही योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करू. मात्र ते योग्य रस्त्यावर येण्यास तयार नसतील तर त्यांना बाजूला करू,’ असं म्हणत शरद पवार यांनी नामोल्लेख न करता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील बंडखोर गटाला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच इंडियाच्या बैठकीत शरद पवार यांनी अशी आक्रमक भूमिका घेतल्याने आता अजित पवार गटाची डोकेदुखी वाढणार आहे.
लालूप्रसाद यादवांची तुफान फटकेबाजी
इंडियाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांनीही आपल्या खास शैलीत भाजपचा समाचार घेतला. ‘आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे. मात्र इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना मी एक आवाहन करणार आहे की, त्यांनी पंतप्रधान मोदींना सूर्यावर नेऊन सोडावं, म्हणजे मोदींचं पूर्ण जगभरात नाव होईल,’ असा टोला लालूप्रसाद यादवांनी लगावला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मनोगताचा समारोप करताना शरद पवार यांचा उल्लेख करत आम्ही संपूर्ण ताकदीने पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. तसंच पवार यांनी पुन्हा त्यांचा पक्ष मजबूत करावा, यासाठी आमच्या शुभेच्छा असल्याचंही लालूप्रसाद यादव म्हणाले.
