• Sat. Mar 7th, 2026

    Praful Patel : ‘माझ्यामुळे अजित दादा बारामतीला उशिरा गेले हे सांगणं दुर्दैवी’, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य

    Praful Patel : ‘माझ्यामुळे अजित दादा बारामतीला उशिरा गेले हे सांगणं दुर्दैवी’, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. रोहित पवार यांनी गेल्या आठवड्यात याबाबत पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला आणि त्यामुळे अजित पवार यांना उशिर झाला, कुणाच्या तरी फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार थांबले होते. त्यामुळे अजित पवार यांचा त्या दिवशी रस्ते मार्गाने बारामतीला जाण्याचा निर्णय रद्द झाला, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. या आरोपांनंतर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यावर भाष्य केलं आहे.

    “उगीच अपप्रचार केला जात आहे. अपघात झाला त्याच दिवशी स्वत: केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बारामतीला पोहोचले, त्यांनी एअर क्राफ्ट एक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो AAIB ही स्वायत्त संस्था आहे, त्यांना तपासासाठी सूचना केली, अधिकार दिला. काही दिवसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी सुद्धा जाहीर केली. त्यामुळे दोन्ही यंत्रणा कामाला लागली होती. परत आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

    ‘मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अजित दादांना फोन केला’

    “लोकांना माहिती नसेल. मी परत-परत सांगतो. अजित दादा आणि माझ्यात शेवटच्या फोनबाबत काही लोकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीवरुन फोन केला. अजित दादा कोणत्या शहरात आहेत ते मला माहिती नव्हतं. मी फक्त त्यांना लक्षात आणू देऊ इच्छित होतो की, आमच्या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी झाली आहे त्याचे पैसे पेंडिंग आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पेमेंट काढावेत ही माझी सूचना होती. त्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई केली ते मला माहिती नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

    Praful Patel

    ‘हे अतिशय दुर्दैवी’

    “लोक म्हणतात की, कुठली राईस मीलची फाईल, ही अतिशय चुकीची बाब आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फोन केला. अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री होते त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी फोन करणं हे माझं कर्तव्य होतं. ते मी करत होतो. माझ्यामुळे ते उशिरा गेले असे सांगण्याचे प्रयत्न काही लोकं करत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. अपघात झाल्याने आम्हाला, महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा आघात आणि धक्का बसला आहे. पण या अशा सामान्य लोकांच्या कामांसाठी फोन केला त्याबाबत तुलना करुन अशा प्रकारे चुकीचा प्रचार करणं हे खेदजनक आहे”, अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

    Praful Patel

    “सत्य समोर आलं पाहिजे. चौकशी पूर्ण आणि निष्पक्ष झाली पाहिजे. अजित दादा यांच्या जाण्याने कुटुंबाचं नुकसान झालंच आहे, पण महाराष्ट्र आणि देशाचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूर्ण सत्य समोर यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार”, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा