Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रचार करत आहेत. पण महायुतीनं त्यांच्या रिपाईंला एकही जागा सोडलेली नाही.
नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करत भाजप नं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नवीन यांची निवड करत भाजप नेतृत्त्वानं पक्षाची धुरा नवीन पिढीकडे देत असल्याचा संदेश दिला. यानंतर आता मोदी सरकारमध्येही नवे चेहरे दिसू शकतात. मोदी सरकारमध्ये असलेल्या, राज्यसभेतून खासदार असलेल्या पाच नेत्यांचा कार्यकाळ याच वर्षी संपत आहे. हरदीप सिंह पुरी, बी. एल. शर्मा, रवनीत सिंह बिट्टू, जॉर्ज कुरियन आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.
ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे, अनेकांची करिअर पणाला; शिवसेना कोणाची? ‘त्या’ ८७ जागा ठरवणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांच्या राज्यसभेची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. मंत्रिपदी कायम राहण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पुन्हा संधी हवी. ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. राज्यसभेची खासदारकी टिकवण्यासाठीच आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप सोबत तडजोड केल्याची कुजबुज पक्षात आहे. आठवलेंनी तडजोड केल्यानं रिपाईंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
रामदास आठवले यांनी मुंबईत १७ जागा मागितल्या होत्या. पण अखेरच्या दिवसापर्यंत यावर कोणताच तोडगा निघाला नाही. शेवटी आठवलेंच्या ३९ कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवलेंशी चर्चा केली. भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी ६ जागा रिपाईंला देण्याचं मान्य केलं. या जागांवरील भाजप, शिवसेनेचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, असा निर्णय झाला. पण त्या जागांवरील उमेदवारांनी अखेरपर्यंत माघार घेतलीच नाही. रिपाईंच्या २६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सध्या १३ उमेदवार रिंगणात आहेत. हे सगळे स्वबळावर लढत देत आहेत.
70 हजार कोटींचा घोटाळा अन् मोदी-फडणवीसांचा पक्ष; अजितदादा अन् चव्हाणांमध्ये जोरदार जुंपली
२०११ पासून रिपाईं एनडीएचा घटक पक्ष आहे. रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत. रिपाईंकडे मंत्रिपद असताना पक्ष नेमका किती वाढला, असा प्रश्न कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारतात. आठवले साहेबांकडे मंत्रिपद आहे. पण कार्यकर्त्यांचं काय, त्यांना काय मिळालं? पक्ष सत्तेत आहे. पण त्यानं कार्यकर्त्यांना काय लाभ होतो? असे प्रश्न रिपाईंचे कार्यकर्ते खासगीत विचारतात. भाजप, शिवसेनेनं मुंबईत रिपाईंला एकही जागा सोडलेली नाही. रिपाईंचे १३ उमेदवार रिंगणात आहेत. पण आठवले महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत, अशी स्थिती आहे.
