• Sun. Mar 15th, 2026
    मोठी अपडेट! जेएनपीला जोडणार 14 किमीचा मार्ग, बडोदा-मुंबई एक्सप्रेसवे कुठून-कुठे? जाणून घ्या

    Vadodara-Mumbai Expressway Update: देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने जेएनपीए बंदर यांना जोडण्यासाठी एनएचएआयकडून दिल्ली-मुंबई कॉरिडॉर उभा होत आहे. बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे.

    baroda mumbai expressway(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    चिन्मय काळे, मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बांधल्या जाणाऱ्या व उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहनांना जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीए) पोहोचविण्यासाठी १४ किमीच्या नव्या व अतिरिक्त रस्त्याचा आराखडा तयार होत आहे. हा रस्ता मोरबे ते कळंबोली मार्गे तळोजा असा असेल. विरार-अलिबाग कॉरिडॉर रखडल्याने एनएचएआयने या हालचाली सुरू केल्या आहेत.

    महाराष्ट्रात हा रस्ता तलासरी ते मोरबे असा तयार होत असून त्याचे बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हा आठ पदरी विशेष महामार्ग माथेरानच्या डोंगराखालील बदलापूरजवळील मोरबे येथे येऊन थांबणार असून त्याठिकाणी एनएचएआयने बोगदा खणला आहे. त्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. तिथून हा मार्ग पुढे जेएनपीएपर्यंत जाणे अपेक्षित आहे. यासाठी २१ किमीच्या रस्त्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग कॉरिडॉर अंतर्गत केले आहे. मात्र एमएसआरडीसीकडून या कामात कमालीची दिरंगाई होत असून प्रकल्प रखडलेल्या स्थितीत आहे. त्यासाठीच एनएचएआयने आता एमएसआरडीसीवर अवलंबून न राहता स्वतःचा १४ किमीचा मार्ग उभारण्यासाठी बृहत प्रकल्प आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

    virar to alibaug
    virar to alibaug

    एमएसआरडीसीच्या नियोजनात अलिबागपर्यंत रस्ता नेण्यासाठी २१ किमीचा रस्ता मोरबे ते करंजाडे असा तयार होणार आहे. त्यासाठीचे भूसंपादनही त्यांनाच करायचे आहे. एनएचएआयने मात्र करंजाडेऐवजी कळंबोलीपर्यंतच्या मार्गाचे नियोजन केले आहे. त्यात नवा रस्ता जेमतेम दोन ते तीन किमीचा असेल. तो मोरबे येथील बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना तळोजापर्यंत घेऊन जाईल. तिथून एमआयडीसीचा रस्ता उपलब्ध आहे.

    या स्थितीत संपूर्ण १४ किमीचा नवा रस्ता बांधण्याऐवजी एमआयडीसीतील रस्त्याचेच वाहतुकीच्यादृष्टीने सक्षमीकरण एनएचएआय करणार आहे. यामुळेच संपूर्ण १४ किमीच्या मार्गाचा खर्च अधिकाधिक १०० कोटी रुपये असेल. या रचनेला मंत्रालयाची मंजुरीदेखील मिळाली असल्याची माहिती एनएएचआयमधील अधिकाऱ्यांनी दिली.

    Maharashtra TimesMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा! ‘या’ तीन वॉर्डात दोन दिवस पाणी नाही, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
    काय आहे विरार-अलिबाग कॉरिडॉर ?

    अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी हा मूळ प्रकल्प १२६ किमीचा जुचंद्र ते अलिबाग असा नियोजित होता. मात्र पुढे तो ९८ किमीचा नवघर (वसई) ते बलावळी (पेण तालुका) असा निश्चित झाला आहे. त्याचा बांधकाम खर्च २६ हजार कोटी रुपये आहे.

    बडोदा-मुंबई महामार्गाचा मुख्य उद्देश जेएनपीए बंदराची संलग्नता आहे. त्यामुळे या महामार्गाची करंजाडेपर्यंतच्या जोडणीची तशीची आवश्यकता नाही. तसेच विरार-अलिबाग कॉरिडॉरला खूप विलंबदेखील झालेला आहे. त्यामुळे सर्वोत्तम उपलब्ध व कमी खर्चाच्या पर्यायात आम्ही कळंबोळी जंक्शनपर्यंतच्या मार्गाचे नियोजन केले आहे. – अंशुमाली श्रीवास्तव, प्रादेशिक अधिकारी, एनएचएआय, मुंबई

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा