• Sun. Mar 8th, 2026
    फुलंब्रीत रोहयो घोटाळ्यात मोठी कारवाई; सात रोजगार सेवक निलंबित, 11 कर्मचाऱ्यांना नोटीस

    Rojgar Hami Yojana: फुलंब्री तालुक्यातील रोहयो घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 11 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

    rojgar hami(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: रोजगार हमी योजनेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सात रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दोन सहायक कार्यक्रम अधिकारी, सात अभियंते आणि दोन संगणक ऑपरेटर अशा एकूण ११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

    फुलंब्री तालुक्यातील ३३ गावांतील ९६ कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो; तसेच महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे तर पुरुषांच्या जागेवर महिलांचे फोटो अपलोड करून पाच कोटी १८ लाख रुपयांची बिले उचलल्याचा प्रकार ‘मटा’ने सहा आणि सात जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करून उघडकीस आणला होता. या वृत्ताची दखत घेऊन राज्याचे रोहयो आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

    बोगस IAS महिलेचा कारनामा! खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही लाखोंचा गंडा

    जिल्हा परीषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सात जुलै रोजी यासाठी चौकशी समिती गठित केली. समितीने दिलेला पहिला अहवाल अपूर्ण असल्याने दुसऱ्यांदा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दुसऱ्यांदा संबधित समितीने अहवाल दिल्यानंतर सीईओ अंकित यांनी गटविकास अधिकाऱ्यांना संबंधित सात ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन सात रोजगार सेवकांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर पंचायत समिती मधील रोजगार हमी योजनेशी संबंधित ११ कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी दिली.
    Maharashtra Timesबिनाबापाची मुलगी म्हणत 3 लाख घेतले, नोटरी केली, पण लग्नाला नेत असताना माया दुसऱ्या गाडीने पळाली
    हे प्रकरण ‘मटा’ने उघडकीस आणल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून दोषी रोजगार सेवक आणि इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात होती. पहिल्यांदा नियुक्त समितीनेही थातूर मातूर चौकशी करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यानंतरही या प्रकरणात चौकशीसाठी दुसऱ्यांदा संबधित नियुक्त समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले. संबधित समितीने चौकशी करूनही पुन्हा कारवाईस टाळाटाळ केली गेली. त्यामुळे खासदार काळे यांनी संसदीय आयुध वापरण्याचा इशारा देताच सात रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देऊन ११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा