Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अवघ्या 28 वर्षांच्या दर्शन महादेव जोगले यांचे आकस्मिक निधन झालं आहे. मे महिन्यात लग्न झालेल्या दर्शनचा सहा महिन्यांतच अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रसाळे गावच्या जोगलेवाडी येथील रहिवासी असलेल्या दर्शन जोगलेचं मे महिन्यात लग्न झालं होतं. मात्र आता त्याचं निधन झाल्याने अवघ्या सहा महिन्यांचा त्याचा संसार अपूर्ण राहिला. रविवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला राजापूर शहर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
इलेक्ट्रीशियनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दर्शन विद्युत वितरण कंपनीत ठेक्याच्या पद्धतीने लाईनमन म्हणून काम करत होता. केळवली विभागात तो जबाबदारीने सेवा देत होता. त्याने आपल्या कष्टाने दोन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केलं होतं आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही समर्थपणे सांभाळली होती. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो नेहमी उत्साहाने सहभागी होत असे.
दरम्यान, दर्शनच्या निधनानं जोगले कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या विवाहित बहिणीचंही निधन झालं होतं. त्यानंतर आता दर्शनच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. राजापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
