• Wed. Mar 11th, 2026

    सहा महिन्यांपूर्वी लग्न, पण अर्ध्यावरच मोडला संसार; 28 वर्षीय युवकाची अचानक एक्झिट, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    सहा महिन्यांपूर्वी लग्न, पण अर्ध्यावरच मोडला संसार; 28 वर्षीय युवकाची अचानक एक्झिट, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अवघ्या 28 वर्षांच्या दर्शन महादेव जोगले यांचे आकस्मिक निधन झालं आहे. मे महिन्यात लग्न झालेल्या दर्शनचा सहा महिन्यांतच अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    सहा महिन्यांपूर्वी लग्न, पण अर्ध्यावरच मोडला संसार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेत अवघ्या 28 वर्षांच्या दर्शन महादेव जोगले या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मे महिन्यातच ज्याचा विवाह झाला होता, त्या दर्शनचं अवघ्या सहा महिन्यांतच अकाली निधन झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. छातीत तीव्र वेदना जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दर्शन जोगले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, रसाळे गावच्या जोगलेवाडी येथील रहिवासी असलेल्या दर्शन जोगलेचं मे महिन्यात लग्न झालं होतं. मात्र आता त्याचं निधन झाल्याने अवघ्या सहा महिन्यांचा त्याचा संसार अपूर्ण राहिला. रविवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला राजापूर शहर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

    इलेक्ट्रीशियनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दर्शन विद्युत वितरण कंपनीत ठेक्याच्या पद्धतीने लाईनमन म्हणून काम करत होता. केळवली विभागात तो जबाबदारीने सेवा देत होता. त्याने आपल्या कष्टाने दोन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केलं होतं आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही समर्थपणे सांभाळली होती. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही तो नेहमी उत्साहाने सहभागी होत असे.

    दरम्यान, दर्शनच्या निधनानं जोगले कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या विवाहित बहिणीचंही निधन झालं होतं. त्यानंतर आता दर्शनच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. राजापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा