• Sat. Jul 4th, 2026

    आरक्षणाच्या लढाईत विचित्र प्रकार: मराठा आणि ओबीसी पालकांनी परस्परांच्या शाळांमधून मुलांना बाहेर काढलं!

    आरक्षणाच्या लढाईत विचित्र प्रकार: मराठा आणि ओबीसी पालकांनी परस्परांच्या शाळांमधून मुलांना बाहेर काढलं!

    Maratha Reservation: नांदेडमध्ये मराठा आरक्षणामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत याचिका दाखल केल्याने एका संस्थेतील मराठा पालकांनी मुलांना शाळेतून काढले. त्यानंतर, ओबीसी समाजानेही मराठा संस्थाचालकांच्या शाळांमधून मुले काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    मराठा आणि ओबीसी पालकांनी परस्परांच्या शाळांमधून मुलांना बाहेर काढलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड: मराठा आरक्षणासंदर्भात शासनानकडून काढण्यात आलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. आतापर्यंत दोन जणांनी या जीआरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातील एक याचिका नांदेडमधून अखिल भारतीय वीरशैव युवक महासंघाचे अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी दाखल केली आहे. मराठ आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून याचीच धग आता शिक्षण संस्थेवर पाहायला मिळत आहे. ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या मनोहर धोंडे यांच्याच संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी अर्ज केला. रिसनगाव येथील 21 जणांनी विद्यार्थ्यांच्या टीसीसाठी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे, ओबीसी समाजानेही आता मराठा संस्थाचालकांच्या शाळांमधून मुले बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण केले होते. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारने हैदराबाद गॅजेटसह अनेक मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरविरोधात अनेक जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत. याच दरम्यान जीआरविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात नांदेडहून प्रा मनोहर धोंडे यांचा समावेश आहे. धोंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर रिसनगावं येथील मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचिकाकर्ता प्रा मनोहर धोंडे यांची लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे स्व मीनलताई ठाकरे निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत मराठा समाजासह सर्वच समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने मराठा समाजातील 21 जणांनी मुलांच्या टीसीसाठी सामूहिक अर्ज केला आहे. या प्रकारानंतर गावात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

    Maharashtra TimesPrakash Mahajan : मी असलो-नसलो तरी पक्षावर परिणाम नाही; प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी, एकच वाईट वाटतं की अमित ठाकरेंना…

    पहिली याचिका दाखल करणारे मनोहर धोंडे नेमके कोण?

    मनोहर धोंडे हे पेशाने प्राध्यापक होते. ते छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी कॉलेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 1988 पासून राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेना पक्षातही काम केले असून मराठवाडा विभाग पदावर काम केले. 1996 साली शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची स्थापना केली. यानंतर 2002 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. लिंगायत समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी काम केलं. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी सेवा जनशक्ती पक्षाची स्थापना केली. त्याच पक्षाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता.

    टीसी काढून घेण्याच्या मराठा पालकांच्या निर्णयामुळे गावात पडसाद

    नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील निवासी आश्रम शाळेतून पाल्याचे दाखले काढण्यासाठी मराठा पालकांनी सामूहिक अर्ज केला. या निर्णयाचे पडसाद गावात उमटले असून या गावात आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या निर्णयानंतर गावातील ओबीसी समाजाने बैठक घेतली असून मराठा संस्था चालकाच्या शाळेतून ओबीसी विद्यार्थी काढून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिसनगावात जय महाराष्ट्र निवासी शाळा आहे. या मराठा संस्थाचालकाच्या शाळेतून ओबीसी विद्यार्थी काढून घेण्याचा निर्णय ओबीसी समाजाकडून घेतला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा