• Sat. Mar 7th, 2026
    अल्पवयीन मुलीला विकून जबरदस्ती लग्न लावल्याचा आरोप, पीडितेच्या वडिलांनी स्वत:ला संपवलं

    Jalgaon Crime News : जळगावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीला विकून जबरदस्ती लग्न लावल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. जळगावात राहणाऱ्या मुलीला रोजगाराच्या बहाण्यांने नेलं आणि नाशिकमध्ये अडीच लाख आणि दागिने घेऊन महिलांनी मुलीला विकलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर पीडितेच्या वडिलांनी स्वत:ला संपवून आत्महत्या केली आहे. तर पीडितेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    निलेश पाटील, जळगाव : जळगावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रोजगाराच्या बहाण्याने घेऊन जात पैसे आणि दागिने घेऊन तिला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या प्रकाराचा धक्का बसल्याने तसेच विकत घेऊन लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण जीवे मारण्याची धमकी देत असल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना आज घडली घडली आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतरच हा प्रकार समोर आला आहे.

    या प्रकाराबाबत तब्बल आठ दिवस उलटूनही रामानंद पोलीस तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी तक्रार घेत नसल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी गळफास घेतल्याचा धक्कादायक आरोप मयताचे भाऊ तसेच मुलाने केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा कुटुंबियांनी घेतला आहे.

    मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, नंतर गर्भपात

    अल्पवयीन मुलींना रोजगाराच्या निमित्ताने घेऊन जाऊन त्यांना विकून देणे, त्यांचे परस्पर लग्न लावले, या सर्व गोष्टींचे मोठे रॅकेट असून याचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करण्याची मागणी सुद्धा नातेवाईकांनी केली आहे. अल्पवयीन मुलीला रोजगाराच्या बहाण्याने मुलीला नाशिक येथे घेऊन जळगावातील काही महिलांनी तिला कोल्हापूरच्या लोकांना अडीच लाख रोख तसेच दागिने घेऊन विकून दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर या काळात अल्पवयीन मुलगी पाच महिन्याची गर्भवती सुद्धा झाली, तिचा गर्भपात सुद्धा झाल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे.

    पीडितेच्या कुटुंबियांचा पोलिसांवरही आरोप

    या प्रकाराला कंटाळून अल्पवयीन मुलगी घरी पळून आली, तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती कथन केली, हे ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या प्रकरणाबाबत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तब्बल आठ दिवसांपासून तक्रार देऊनही रामानंदनगर पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप केला आहे.

    मुलीला विकत घेणारे तसेच तिच्या सोबत लग्न करणारे कोल्हापूर येथील कुटुंब मुलीला परत पाठवा तसेच आमचे पैसे सुद्धा द्या अशाप्रकारे त्रास देत धमकी देत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर दुसरीकडे याबाबत पोलीसही तक्रार घेत नसल्याने या सर्व गोष्टींना कंटाळूनच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा